

नाशिक रोड : उल्हासनगर येथील व्यापाऱ्याचा नाशिक रोडला धावती रेल्वेमध्ये चढताना हात सटकल्याने फलाट आणि बोगी यांच्यातील फटीत सापडून मृत्यू झाला. हा व्यापारी 15 ते 20 मीटर एक्सप्रेसबरोबर फरपटत गेल्याने त्याच्या डोक्याला तसेच छातीला गंभीर जखमा होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, उल्हासनगर येथील व्यापारी हरेश खेमचंद उदासी (55), पत्नी मेनका (49), मुलगा हिरेन (21) तसेच अन्य 18 नातेवाईक सकाळी 8 च्या सुमारास कल्याण येथून हरिद्वारला दर्शनासाठी हरिद्वार एक्सप्रेसने चालले होते. नाशिक रोड रेल्वे स्थानकात फलाट 2 वर सकाळी 11 च्या सुमारास गाडीचे आगमन झाले. हरेश उदासी हे पाण्याची बाटली विकत घेण्यास उतरले. पाण्याची बाटली घेत असतानाच गाडी सुरू झाली. पळत जाऊन गाडी पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा डब्याच्या दरवाजानजीकच्या स्टील रॉ़डवरील हात सटकला. त्यामुळे ते फलाट आणि रुळाच्या मध्यभागी पडले. गाडीने वेग घेतल्याने त्यांचे डोके आणि छाती फलाटाला घासत गेल्याने त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर जखमा झाल्या. इतर प्रवाशांनी आरडाओरड करताच काही प्रवाशांनी चेन पुलिंग केल्याने गाडी पुन्हा थांबली. हरेश उदासी यांना रेल्वेरुळावरून बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सकाळीच मुंबईत लोकलमधून आठ प्रवासी पडल्याची घटना मुंब्र्याजवळ घडली. त्यात चौघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या तासाभरात नाशिक रोड स्थानकात ही घटना घडली.
रेल्वे प्रशासनकडून चालती गाडी पकडणे धोकादायक असल्याबाबत वारंवार घोषणा केली जाते. त्याबाबतचे फलकही लावले जातात. मात्र प्रवासी निष्काळजीपणा करून आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे प्रशासन प्रवासादरम्यान सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन बनकर यांनी केले.