

देवळा : पुढारी वृत्तसेवा
कांदा दरात सातत्याने होत असलेली घसरण आणि उत्पादन खचर्चापेक्षाही कमी मिळणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २६) मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुली येथे कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांनी केले आहे. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ६०० ते ७०० रुपये दर मिळत असून, केंद्र सरकारने जाहीर केलेला १,२३५ रुपयांचा खरेदी दरही अपुरा असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
उत्पादन खर्च, मजुरी, खते, बियाणे, इंधन व वीजदर वाढले असताना, कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. महामोर्चात खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत भास्कर भगरे, डॉ. शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे, आमदार रोहित पवार, माजी आमदार कॉ. जे. पी. गावित, माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, मविप्र संचालक विजय पगार, माजी संचालक डॉ. विश्राम निकम, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत शेवाळे तसेच काँग्रेस तालुकाध्यक्ष दिनकर निकम यांनी केले आहे.
साठवणुकीतील कांदाही खराब
भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. मात्र अतिउष्णतेमुळे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.