नाशिक : महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच होतील, असा दावा करणारे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी २४ तासांतच कोलांटउडी घेतली असून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे महाविकास आघाडीचे नेंते ठरवतील, त्याबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे स्पष्टीकरण देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिव सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर खा. देसाई यांनी मंगळवारी(दि.१३) पक्षाच्या शालिमार येथील कार्यालयात आयोजित बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करताना महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच होतील, असा दावा केला होता. दरम्यान बुधवारी(दि.१४) देसाई यांच्या उपस्थितीत नाशिक महानगरातील चारही विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणूकांसाठी शिवसैनिकांना मरगळ झटकून काम करण्याचे आवाहन देसाई यांनी केले. तर नाशकात शिवसेना ठाकरे गटाची जोरदार बांधणी झाली असून कोणतेही आव्हान पेलण्यास ते सज्ज असल्याचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे सहसचिव प्रवीण महाले, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वंसत गिते, योगेश घोलप, कोअर कमेटी सदस्य डी.जी. सूर्यवंशी, आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना देसाई यांनी सर्वसंमतीनेच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरेल असे स्पष्टीकरण दिले.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ निहाय उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच जाहीर करतील, असे खा. देसाई यांनी सांगितले. विधानसभा निवडणूकीसाठी ठाकरे गट सज्ज असून संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांची फौज उभी राहिल्याचा दावाही देसाई यांनी केला.