वणी : येथील तिळेश्वर महादेव मंदिरा जवळील नदीवर ऐतिहासिक काळापासून असलेला दगडी पुल तोडल्याने या ठिकाणी होत असलेल्या दशक्रिया विधीत पिंडदाना साठी नातेवाईकांना गुडघाभर नदीच्या पाण्यातून कसरत करत काही विधी उरकावे लागत आहेत.
त्यात दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. नदीनाल्यांना पूर आला असून नदीच्या पाण्याची पातळी नेहमी पेक्षा जास्त आहे. अशा परिस्थिीतत वयस्क अबाल वृद्धांना पाण्यातून जाऊन अंत्यविधी उरकून घ्यावे लागत आहेत. वणी येथील शिवाजी पैठणे यांच्या दशक्रिया विधी दि. २५ जुलै रोजी देवनदी तीरावर होता. यावेळी अनेक लोक उपस्थित होते. नदीवरील दशक्रिया झाल्यानंतर पिंडदान करण्यासाठी पलीकडे जावे लागल्याने दरम्यान काहीना पाण्यातील दगड गोट्यांचा अंदाज आला नाही आणि ते पाण्याच्या प्रवाहामुळे पडले. नदीच्या पाण्यात अचानक वाढ होती की काय ही भिती यामुळे आप्त स्वयकींयानी संताप व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच ठेकेदाराने नविन पूल बांधण्यात येत असतांना या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक दगडी पुलाची अडचण नसतानांही बुध्दीपुरस्कर पूल पाडल्याचा नागरिकांनी आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला.
याबाबत तहसीलदार वणी ग्रामविकास अधिकारी तलाठी यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार दिली असून त्यावर अद्याप कोणतीच कारवाई होतांना दिसत नाही. २५०वर्षांची परंपरा असलेला पूल पाडणा-या ठेकेदाराला प्रशासन पाठीशी घालतांना दिसत आहे. या बाबत कोणीच गंभीर नाही. तलाठी यांनी रिपोर्ट बनवतांना पूल तोडताना कोणी पाहिला नाही कोणी व्यक्ती आढळून आली नाही असा अहवाल पुढे सरकारला आहे. पुलाचे काम सुरू करतांना नदीत खोदकाम करतांना त्याची माहिती नसावी का अनेक प्रश्न आहेत. परंतु यामुळे होणारी अडचण मोठी आहे. काही दिवसात श्रावण महिना सुरू होत आहे. नदीच्या पलीकडे असलेल्या मंदिरात जाण्यासाठी असलेला दगडी पुल तोडल्याने भाविकांची मोठी अडचण होणर आहे. ठेकेदाराला अनेक वेळा ग्रामपंचायत किंवा तत्सम अधिका-यांनी फोन केले. परंतु कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. पुढच्या आठवड्यात वणी ग्रामस्थां वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आजोबांचे दशक्रिया विधी कार्यक्रम वणी देवनदी तीरावर होता. दशक्रिया विधी आटोपल्या नंतर पिंडदान करतांना मोठी कसरत करावी लागली. येथील दगडी पूल तोडल्याने नातेवाईकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत नदी पलीकडे पिंडाचा घास ठेवण्यासाठी जातांना घरातील महिला वयस्कर व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागला. दोघे जण पाय घसरून पडले तर एकाच्या पायात काटा घुसला ही अतिशय वाईट बाब आहे. झोपलेले प्रशासन जागे होईल का असा प्रश्न पडला आहे.
नामदेव पैठणे, वणी
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे असे मानले जाते की, मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ति मिळत नाही. इच्छा नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही. अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा पिंडाला स्पर्श करून कावळा शिवला असे मानतात.
वणी येथील ऐतिहासिक दगडी पूल पाडल्याने नदीच्या पाण्यातून वाट काढत मंदिरात किंवा पिंडदान करायला जावे लागते. नदीला पूर आल्यावर जाता येत नाही. प्रशासकिय यंत्रणेस अर्ज देऊनही त्याचे गांभीर्य नाही. ठेकेदाराकडून मनमानी पणाने पुल पाडला असून त्याची अरेरावी सहन करावी लागत आहे. तलाठी ग्रामविकास अधिकारी यांना तक्रार अर्ज प्राप्त होऊन ही ते वेळकाढून पणा करत आहेत. प्रशासकिय यंत्रणा थंड असुन या बाबीचा गांभीर्य त्यांना नाही.
दिगंबर पाटोळे, वणी