

देवळा ( नाशिक ) : शेतकरी मोठ्या कष्टाने पीक घेतो, मात्र त्याला पिकवलेल्या मालाचा योग्य मोबदला मिळत नाही, हे दुर्दैव असल्याचे मत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले. कांद्यासह इतर पिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत असून सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची अद्याप भरपाई मिळालेली नाही. कर्जमाफीचा विषय तर दूरच राहिला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला मतदान करू नका आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला.
शनिवार (दि.27) रोजी सकाळी 9 वाजता ऐतिहासिक कांचन किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या शिव विजयस्तंभ येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी खर्डे येथे आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेटही दिली.
कडू म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन फसवले आहे. मात्र हे वास्तव शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. या पक्षांच्या आश्वासनांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रहार संघटनेचे गणेश काकुळते, शशिकांत पवार, भाऊसाहेब मोरे, माधव ठोंबरे यांच्यासह मधुकर देवरे, विजय जगताप, संजय शिंदे, सुभाष जाधव, बापू देवरे, भाऊसाहेब देवरे, त्र्यंबक जाधव, अशोक गांगुर्डे, सुनील जाधव, शशी ठाकरे, सचिन गांगुर्डे, गिरीश पवार, केदा पवार, तुषार जाधव, कैलास पगार, सुभाष पवार, पंकज आहेर, बापू पवार, अशोक पवार, बबलू पवार, बाळासाहेब आहेर, रामभाऊ आहेर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.