नाशिक : द्राक्षाचा हंगाम पूर्णत्वाला गेला असताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. चांदवड, निफाड आणि दिंडाेरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांना ठगवत व्यापाऱ्यांनी गाशा गुंडाळला आहे. त्यात आता ४८ बागायतदारांना एकाच कंपनीने एक कोटी ५२ लाख ३९६ रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या शेतकऱ्यांचे आता पोलिस कारवाईकडे लक्ष लागले आहे.
शाम अशोक विधाते (४५, रा. पिंपळगाव बसवंत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित नरेंद्र दिनकर जाधव, ऋषिकेश दिनकर जाधव (दोघे रा. सोनजांब), उमेश गौतम उर्फ रामकुमार (रा. मंडोली, हिमाचल प्रदेश), विशाल माेहन कंदवा (रा. वाराणसी), बाळासाहेब उर्फ पप्पू एकनाथ आहेर (रा. वडाळीभोई) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
नरेंद्र याच्या श्री भोले व्हेजिटेबल कंपनीमार्फत इतर आरोपींनी विधाते यांच्या बागेतील मालाचा सौदा केला. ३७०० रुपये क्विंटलप्रमाणे दर देत आगाऊ ५० हजार रुपये आनलाइन देण्यात आले. एकूण ८८.१० क्विंटल माल उचलत त्यापोटी दोन लाख ७५ हजार २४५ रुपयांचा धनादेश देण्यात आला. मात्र, हा धनादेश वटला नाही. अशाच पद्धतीने या व्यापाऱ्यांनी एकूण ४७ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा विधाते यांना बँक शाखेतून कळाले. बँक खात्यात पुरेसी रक्कम नसतानाही संबंधितांनी ४८ जणांना धनादेश देऊन तब्बल एक कोटी ५२ हजार रुपयांचा गंडा घातला. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे अधिक तपास करत आहेत. संशयितांना अटक झालेली नाही.