

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नियमित करदात्यांसाठी मनपाने लागू केलेली कर सवलत योजना मनपाला पावली असून, या योजनेअंतर्गत दोन महिन्यांतच तब्बल १०१ कोटींची विक्रमी घरपट्टी वसूल झाली आहे. दोन लाख मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, तब्बल चार कोटींची करसवलत मिळविली आहे.
सहा टक्के करसवलत मिळविण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक राहिले असून, जूनमध्ये तीन टक्के सवलत मिळणार आहे. मनपाला गेल्या आर्थिक वर्षात घरपट्टीतून २८८ कोटींचा महसूल मिळाला होता. यात करसवलत योजनेतून मिळालेल्या महसुलाचा वाटा मोठा होता.
पाठोपाठ अभय योजना लागू गेल्यामुळे सुधारित ३०० कोटींच्या उद्दिष्टापैकी २८८ कोटींची विक्रमी वसुली करण्यात कर वसुली विभागाला यश आले. आता नवीन आर्थिक वर्षात मनपाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कर सवलत योजना लागू केली आहे. या अंतर्गत घरपट्टीची रक्कम एकरकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के, मेमध्ये सहा टक्के सवलत दिली गेली, तर जून महिन्यात तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. या सवलत योजनेतून १ एप्रिल ते २९ मे या कालावधीत १०१ कोटींचा महसूल मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
करदात्यांना चार कोटींची सवलत
या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यामध्ये एक लाख ५५ हजार करदात्यांनी ७६ कोटींचा भरणा केला, तर मे महिन्यामध्ये ३५ हजार करदात्यांनी २५ कोटींचा भरणा केला. या दोन महिन्यांत १०१ कोटींची घरपट्टी वसूल झाली. या योजनेपोटी करदात्यांना चार कोटींची सवलत मिळाली आहे.
66 नियमित करदात्यांसाठी राबवलेल्या सवलत योजनेतून दोन महिन्यांत १०१ कोटींची घरपट्टी वसूल झाली आहे. मे महिन्यातील शेवटचे दिवस उरले असून, करदात्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.
अजित निकत, उपायुक्त (कर), मनपा