

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात सिंहस्थ कामांमुळे सुरू असलेल्या रस्ते विकासासह जलवाहिन्या, मलवाहिका तसेच विविध प्रकारच्या केबल्स टाकण्याच्या कामांमुळे तब्बल ५५ ठिकाणी जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे तसेच शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याच्या व्यावसायिक दराच्या पाचपट दराने ठेकेदारांना तब्बल २६.१६ लाखांच्या दंडाच्या नोटिसा बजाविल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिंहस्थ कुंभमेळा आता अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहर परिसरात सुमारे ३० हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत, यात रस्ते विकासासह जलवाहिन्या, मलवाहिका टाकण्यासाठी तसेच विविध प्रकारच्या केबल्स टाकण्यासाठी रस्ते खोदले जात आहेत.
रस्ते खोदकाम करताना संबंधित ठेकेदारांकडून काळजी घेतली गेली नसल्याने रस्त्यांखालील जलवाहिन्या फुटत आहेत, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
महासभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने १६ ठेकेदार कंपन्यांना नोटीस पाठवून भरपाई मागितली आहे. व्यावसायिक पाण्याचा दर २७ रुपये प्रतिलिटर आहे. त्या अनुषंगाने जवळपास २६ लाख १६ हजार ३०० रुपये वसुलीच्या नोटिसा ठेकेदार कंपन्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
सिंहस्थ कामांसाठी रस्ते खोदकाम करताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जलवाहिन्या फुटत आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ठेकेदारांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग