नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (राखण्यासाठी) महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य (मलेरिया) विभागातर्फे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत नागरिकांना आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून विविध भागांत फवारणी, धूरफवारणी आणि गप्पी मासे वितरण यासारख्या उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
डेंग्यू आणि चिकनगुनिया हे प्रामुख्याने एडिस इजिप्ताय या डासामुळे पसरतात. हा डास स्वच्छ पाण्यात वाढतो, विशेषतः सात दिवसांपेक्षा जास्त काळ साचलेल्या पाण्यात त्यांची उत्पत्ती होते. त्यामुळे घरातील व परिसरातील पाणी साचू न देणे हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना मानली जाते.
आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी, टाक्या व हौद स्वच्छ करून कोरडे ठेवावे.
कुलर, फ्रीज ट्रे, फुलदाण्या आणि कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नये.
परिसरात पडून असलेले टायर, डबे, नारळाच्या करवंट्या किंवा प्लास्टिक कचरा तातडीने हटवावा.
पाण्याच्या टाक्यांवर झाकण ठेवणे, तसेच बांधकामस्थळे व गच्चींवर पाणी साचू देऊ नये.
नागरिकांनी अंगभर कपडे वापरावे.
आवश्यकतेनुसार डासप्रतिबंधक क्रीम किंवा जाळ्यांचा वापर करावा.
ताप, अंगदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना किंवा पुरळ आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
स्वतःहून औषधे घेणे टाळावे, वेदनाशामक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
विभागनिहाय संपर्क अधिकारी आणि क्रमांक :
पूर्व (प्रभाग १४, १५, १६, २३, ३०)- महेंद्र कांबळे- ९१३००४७६२४
पश्चिम (प्रभाग ७, १२, १३)- राजेश वाघ- ९९२१८०३४४७
पंचवटी (प्रभाग १ ते ६)- रवींद्र राऊत- ९८३४३९२१९३
सिडको (प्रभाग २४, २५, २७, २८, २९, ३१)- नदिमखान पठाण- ९८२२७४७७७०
सातपूर (प्रभाग ८, ९, १०, ११, २६)- नारायण जाधव- ८६६८८७७६०६
नाशिकरोड (प्रभाग १७ ते २२)- अनंता वाघ- ९२६०१०१०४८
"डास निर्मूलनासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, प्रत्येक नागरिकाने स्वच्छता राखून पाणी साचू न देणे हीच सर्वात प्रभावी उपाययोजना आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल."
— मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका