

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रभागातील विकासकामांचा बॅकलॉग भरण्यासाठी चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा विकास निधी राज्य शासनाने महापालिकेला उपलब्ध करून देण्याची मागणी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी या निधीची आवश्यकता असल्याचे सभापती सानप यांनी निवेदनात नमूद केले आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वाढणारा नागरी विस्तार आणि मूलभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेता प्रभागस्तरावर विकासकामे वेगाने करण्यासाठी राज्य शासनाचा विशेष निधी आवश्यक असल्याचे सानप यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेत सध्या महायुतीची सत्ता असून, बहुसंख्य नगरसेवक महायुतीचे आहेत. मागील चार वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने अनेक विकासकामे रखडली असून, नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहिल्या आहेत. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधींवर नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत.
नाशिकला २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा व इतर पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे सानप यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रशासकीय राजवटीनंतर विकासाची अपेक्षा
मागील चार वर्षे मनपात प्रशासकीय राजवट असल्यामुळे अनेक विकासकामे प्रलंबित राहिली. त्यामुळे आता नव्या प्रतिनिधींकडून प्रभागांमध्ये मूलभूत सुविधा व विकासकामे वेगाने पूर्ण होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या कामांसाठी राज्य शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सानप यांनी निवेदनात म्हटले आहे.