

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व नियोजित कामे वेळेत पूर्ण करावीत आणि त्यासाठी महसूल विभागाने भूसंपादनाच्या प्रक्रियेला अधिक गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये सोमवारी (दि. ८) भूसंपादन - सद्यः स्थिती व अपेक्षित मार्गदर्शन या विषयावर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. अपर मुख्य सचिव म्हैसकर म्हणाले की, 'राज्य शासनाच्या वतीने कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सोयीसुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे केवळ वेळेतच पूर्ण करून चालणार नाही, तर ती अत्यंत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार झाली पाहिजेत. यासाठी सर्वच संबंधित विभागांनी सांघिक भावनेने (टीम वर्क) काम करणे गरजेचे आहे.
नियमांच्या चौकटीत राहून नाशिक परिक्रमा मार्गासह भूसंपादनाच्या सर्व प्रकरणांना गती द्यावी. बैठकीत म्हैसकर यांनी ऊर्जा विभाग, रेल्वेस्थानक विकास, साधुग्राम, वाहनतळ व्यवस्थापन, नाशिक परिक्रमा मार्ग, वृक्षतोड आणि वनसंवर्धन प्रस्ताव यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा आढावा घेतला.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीही प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक ते मार्गदर्शन केले, बैठकीस नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय सल्लागार ब्रजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे आदी उपस्थित होते
२२ भूसंपादन प्रस्तावांपैकी बहुतांश जागांचा ताबा
कुंभमेळ्याच्या तयारीची माहिती देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी एकूण २२ भूसंपादन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये रेल्वेस्थानके, राष्ट्रीय महामार्ग, पाटबंधारे विभाग, त्र्यंबक नगर परिषद, नाशिक महानगरपालिका आणि नाशिक परिक्रमा मार्ग यांच्याशी संबंधित प्रस्तावांचा समावेश आहे. समाधानकारक बाब म्हणजे यातील बहुतांश प्रस्तावांचा अंतिम निवाडा झाला असून, जागेचा ताबाही मिळाला आहे. त्यामुळे कामांना वेग आला असून, उर्वरित कामेही कुंभमेळ्यापूर्वी वेळेत पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले.