

इगतपुरी (नाशिक) : तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या खडकेद इंदोरे या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील मुख्य जलस्रोत विहीर आणि हापसे पूर्णपणे आटल्याने नागरिकांपुढे पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
महिलांना आणि मुलींना दोन किलोमीटर पायपीट करत टेकडी उतरून स्म शानभूमीजवळील हापशावरून पाणी भरावे लागत आहे. मात्र, आता त्या हापशसचेही पाणी कमी पडू लागले आहे. एक हंडा पाणी भरण्यास 20 ते 25 मिनिटांचा वेळ लागत आहे. पाण्याची धार बारीक असल्याने अर्धा हंडा भरल्यानंतर पाणी थांबते व काही वेळ थांबूनच पुढे भरता येते.
पावसाचे माहेरघर व धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीत 16 छोटी- मोठी धरणे असून, या धरणांच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या भागांना पाणीपुरवठा होतो. ऑक्टोबर 2024 अखेर तालुक्यातील ही धरणे तुडुंब भरलेली होती. मात्र, साडेतीन महिन्यांतच आरक्षित पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. परिणामी, आजच्या स्थितीला वालदेवी 48, दारणा 42, मुकणे 47, वाकी 39, भाम 25 टक्के पाण्याचा साठा आहे. इगतपुरी तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणार्या भावली धरणात अवघा 28 टक्के पाणीसाठा राहिल्याने चिंता वाढली आहे. या परिस्थितीमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थकवा, दम लागणे आणि उन्हामध्ये तासनतास उभे राहणे हे त्यांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. विद्यार्थिनींचे शिक्षण बुडत आहे, तर महिलांचा रोजगारही यामुळे संकटात आला आहे. आजूबाजूला डोंगर व जंगल असल्यामुळे पाणी आणताना जंगली श्वापदांची भीतीदेखील महिलांना जाणवते. ही केवळ पाण्याची समस्या नाही, तर ती आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता आणि विकास यांच्याशी निगडित गंभीर सामाजिक समस्या झाली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
नावालाच धरणांचा जिल्हा, हंडाभर पाण्यासाठी करावी लागते कोसो दूर पायपीट, इगतपुरीत पाण्याचे भीषण वास्तव आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील महिलांना दरवर्षी येतो. पाण्यासाठी डोंगरदर्या कड्या- कपार्यांवर अक्षरशः पाण्याचा शोध घ्यावा लागतो. काही ठिकाणी तर दगडांधून झिरपणार्या पाण्याच्या थेंबांची साठवण करून हंडा भरला जातो. त्यामुळे त्यासाठी कमीत कमी एक ते दोन तास एका महिलेला लागतो. अशा सर्व महिलांचे पाण्याचा हंडे भरले की, सर्व महिला घराची वाट धरतात.