

खेडगाव : दिंडोरी व निफाड तालुक्यातील द्राक्ष काढणीच्या हंगामास जानेवारी महिन्यात सुरुवात झाली आहे. यावर्षी अतिरिक्त पावसामुळे द्राक्षपीक धोक्यात आले आहे. त्यापैकी बऱ्याचशा द्राक्षबागा तोडल्या आहेत. उरलेल्या द्राक्षबागांना प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका बसला आहे. एकूण द्राक्ष उत्पन्नाच्या 30 ते 40 टक्के उत्पन्न यावर्षी निघण्याची शक्यता आहे.
यावर्षीचा द्राक्ष काढणीचा हंगाम खूप दिवस चालणार नाही. एकरी उत्पन्न हे निम्म्याहून कमी घटले आहे. यावर्षी फळधारणा खूप कमी प्रमाणात झाली असून, त्याचा परिणाम उत्पन्नात घट होण्यावर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे निघणारे एकरी सरासरी उत्पन्न यावर्षी निघणार नाही. यावर्षी द्राक्षभावात तेजी जरी दिसत असली तरी उत्पन्न कमी निघत असल्यामुळे दरवर्षीसारख्या मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ बिघडणार आहे.
द्राक्ष हे पीक वर्षातून एकदा येते. द्राक्षवेलीस द्राक्ष येवो अगर ना येवो परंतु, त्यावर रासायनिक खते, पावडर, मजूर खर्च चुकत नाही. द्राक्षबागेची लागवड केल्यानंतर साधारणपणे व्यवस्थित निगा ठेवल्यास द्राक्षबाग 15 वर्षे चालते. एखाद्या वर्षी उत्पन्न जरी नसले तरी द्राक्षबाग पुढील उत्पन्नासाठी सांभाळावी लागते. सध्या निफाड व दिंडोरी तालुक्यात अनेक परराज्यातील द्राक्ष व्यापारी दाखल झाले असून, द्राक्ष काढणीस सुरुवात झाली आहे.
यावर्षी उत्पन्न खूप कमी असल्याने शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीसाठी व्यापारी पाहण्याची गरज असणार नाही. व्यापारी स्वतःहून द्राक्षाचा शोध घेत आहेत. यावर्षी पेड कटिंग म्हणजेच झाडावरून तोडलेली द्राक्ष थेट प्रतवारी न करता पॅकिंग केली जातात. शक्यतो द्राक्ष ही प्लास्टिकच्या 20 किलोच्या क्रेटमध्ये पॅक केली जातात. शेतकरी यावर्षी शक्यतो रोख पेमेंट घेण्याची बोली करूनच माल देत आहे. यावर्षी द्राक्ष काढण्याचा हंगाम हा जास्त दिवस जाणार नसल्यामुळे तसेच द्राक्ष प्रतवारी नसल्याने मजुरांवर रोजगाराची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला द्राक्ष जास्त भाव असल्याने आंबटच लागण्याची शक्यता आहे. गोरगरिबांना द्राक्ष खरेदी करून खाणे परवडणारे नाही.