नाशिक : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६७ टक्के जलसाठा झाल्याने नाशिककरांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. आॉगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस होणार असल्याने जायकवाडीला विसर्गाचा मुद्दाही निकाली निघणार आहे. ७८ टक्के धरण भरल्यानंतरच जायकवाडीसाठी विसर्ग केला जाणार आहे.
धरणांतील साठा दशलक्ष घनफूटमध्ये (टक्के)
गंगापूर- ३६९५ (६५.६३)
मुकणे- २७८७ (३८.५०)
कश्यपी- ६०३ (३२.५६)
गौतमी गोदावरी- ११८९ (६३.६५)
दारणा- ६११३ (८५.५१)
नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नाशिक व नगरच्या धरणांतून मराठवाड्याकरीता ८.६ टीएमसी पाणी जायकवीडीत सोडण्यात आल्याने नाशिककरांच्या पाणीआरक्षणात ७८६ दशलक्ष घनफूटाने कपात केली गेली. परिणामी जुलैत नाशिककरांवर पाणीकपातीचे काळे ढग घोंगावू लागले होते. धरणातील जलसाठा तळाला गेल्याने चर खोदून मृतसाठाही उचलण्याची तयारी महापालिकेने केली होती. कश्यपी धरणातील सुमारे ३०० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणात सोडून नाशिककरांवरील जलसंकट दूर करण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात आला. चर खोदण्यासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान, २२ जून पासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने धरणाकडे येणारे नदी, नाले प्रवाहित झाले. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणसाठ्यात वाढ झाली आहे.
गंगापूर धरणाचा साठा हा ६७ टक्क्यावर पोहचला असून गंगापूर धरणसमूहाचा साठा हा ५८.६८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत समुहात ६६.७९ टक्के साठा होता. मागील वर्षापेक्षा कमी पाणी साठा असला तरी श्रावणात धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर व ईगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस होत असल्याने पाण्याची तुट भरून निघेल. त्यामुळे नाशिककरांचा पाणीप्रश्न आता मार्गी लागला असून जायकवाडीच्या विर्सगासाठी आता आगामी काळात पावसाची प्रतिक्षा असणार आहे.