

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी यंदा सोयाबीन आणि मका पिकाला सर्वाधिक पसंती दिली आहे. खरीप हंगामासाठी निश्चित उद्दिष्टापेक्षा अधिक मका आणि सोयाबीनची लागवड झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या ९७ टक्के पूर्ण झाल्या आहेत.
बागलाण, चांदवड, देवळा, निफाड, सिन्नर आणि येवला या सहा तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पेरणी झाली आहे. मात्र पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
यंदाच्या खरीप हंगामात ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर लागवडयोग्य क्षेत्रापैकी ६ लाख १७ हजार ९२७ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील एकूण ९६.४७ टक्के क्षेत्रावर खरीप लागवड झाली आहे.
यंदा मान्सूनचे आगमन सुमारे तीन आठवडे उशिरा झाल्याने खरीप पेरण्यांना विलंब झाला. सुरुवातीला पावसाचा जोर कमी असल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत नगदी पिकांची पेरणी केली. त्यानंतर झालेल्या पावसामुळे उर्वरित क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली. उशिरा झालेल्या पेरणीमुळे यंदाचा खरीप हंगाम साधारण महिनाभर लांबण्याची शक्यता आहे.
तालुका निहाय खरीप पेरणीची टक्केवारी
बागलाण: १००.०५%
चांदवड: ११४.५०%
देवळा: १०३.३७%
दिंडोरी: ९६.००%
इगतपुरी: ८६.७३%
कलवण: ९९.७३%
मालेगाव: ९९.९०%
नांदगाव: ९७.८५%
नाशिक: ७७.४७%
निफाड: १०२.२४%
पेठ: ६३.७९%
सिन्नर: १०५.५१%
सुरगाणा: ६१.३३%
त्र्यंबकेश्वर: ७४.१२%
येवला: १०३.२३%
जिल्हा एकूण: ९६.४७%
सोयाबीन उद्दिष्टापेक्षा अधिक
कृषी विभागाने यंदा ९९ हजार ९४१ हेक्टरवर सोयाबीन लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, शेतकऱ्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद देत १ लाख ९ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली आहे.
मक्याची विक्रमी लागवड
यंदा जिल्ह्यात मक्याच्या लागवडीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दोन लाख ३६ हजार ६२१ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ३ लाख ७ हजार ८४ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड झाली. हे उद्दिष्टाच्या १२९.९८ टक्के असून, सरासरीपेक्षा जवळपास ३० टक्के अधिक क्षेत्र मका लागवडीखाली आले आहे.