

देवळाली कॅम्प ( नाशिक ): नाशिक सहकारी साखर कारखाना लि. पळसे संचालित अष्टलक्ष्मी कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी गाळप होणाऱ्या उसाला प्रती मे. टन 3,001 रुपये भाव देणार असल्याची घोषणा संचालक प्रसाद घावटे यांनी केली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
नाशिक सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामासाठी दोन लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. माजी खासदार हेमंत गोडसे, शेरजाद बाबा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम सुरू आहे. चालू हंगामात उसाला काय दर जाहीर होतो, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकरकमी 3,001 रुपये भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखाना गळीत हंगाम सुरू करताना संचालक प्रसाद घावटे यांनी इतर कारखान्यांच्या तुलनेत भाव देण्याचा शब्द दिला होता तो या निमित्ताने पूर्ण करण्यात आला.
नाशिक व निफाड कार्यक्षेत्रातून येणाऱ्या उसाला 3,001 रुपये भाव देण्याची घोषणा करण्यात आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. चालू गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्याचे ऊस पेमेंट सबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. कारखाना अनेक संकटांवर मात करत पुढे जात आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा व परिपक्व ऊसपुरवठा आपल्या कारखान्याला करावा, असे आवाहन कारखाना संचालक प्रसाद घावटे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील, राजेंद्र जंगम, शेतकी अधिकारी अजित गुळवे, विनोद ढगे आदींनी केले आहे.