![Nashik Mumbai Birahad Morcha](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2Fdcf7f0b4-4aca-4f08-a3f6-5271a6588cee%2F481267ea_8520_4c6a_9a64_aaef62a0bc71.jpg?rect=0%2C0%2C1280%2C720&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
इगतपुरी (नाशिक) : महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग ३ व वर्ग ४ या कर्मचाऱ्यांच्या बिऱ्हाड मोर्चाला इगतपुरी येथुन शुक्रवारी (दि.२८) सकाळी भरपावसात सुरुवात झाली आहे. मात्र मोर्चेकरांनी कसारा घाटात अचानक रास्ता रोको केल्यामुळे मुंबईला जाणाऱ्या व नाशिकला येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
बिऱ्हाड मोर्चा इगतपुरी येथून निघून मंत्रालयावर धडकणार आहे. सध्या बिऱ्हाड मोर्चा इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरात गुरुवारी (दि.२७) मुक्कामी होता. मानधन वाढ, सेवा सुरक्षा, सरसकट समायोजन यासह इतर मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. १२ जून रोजी सकारात्मक चर्चा झाल्याने हा मोर्चा स्थगित केला होता.
मात्र दहा दिवस मुदतीचा कालावधी उलटूनही सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने बिऱ्हाड मोर्चाने परत एकदा भरपावसात भव्य मोर्चाला सुरुवात केली आहे. या मोर्चात शेकडोच्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले कर्मचारी सहभागी झाले असून मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर जीवन संपवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विविध मागण्यासाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरपावसात निघालेला बिऱ्हाड मोर्च्याने कसारा घाटात मुंबई - नाशिक व नाशिक - मुंबई महामार्गावरच ठाण मांडून शुक्रवारी (दि.२८) दुपारी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा इगतपुरीहून निघाला असून सरकारने मागण्यांकडे लक्ष द्यावे म्हणून मोर्चा कसारा घाटात येताच रास्ता रोकोला सुरवात केली आहे. रास्ता रोकोमुळे दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन दोन ते तीन किलो मीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत..