नाशिक : खड्ड्यांच्या समस्येमुळे अगोदरच हैराण झालेल्या नाशिककरांना ऐन गणेशोत्सवात वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सीबीएस ते राणे डेअरी परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे एकाच बाजुने दुतर्फा वाहतुक सुरु आहे. अरुंद रस्ता, खड्ड्यांची समस्या अन् दुसर्या बाजुने पत्र्यांचे बॅरिकेडस यामुळे वाहनधारक वैतागले आहेत.
गणेशोत्सव सुरु झाल्याने सध्या शहरात उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरु आहे. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरात गर्दी वाढली आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शरणपूररोडवर सीबीएस ते राणे डेअरी या भागात चार महिन्यांपासून काम सुरु आहे. राजीव गांधी भवन सिग्नल चौफुलीवर गंगापूरोड, स्वा. सावरकर जलतरण तलाव, मेहेर, सीबीएस या चारही दिशांनी रस्ते येऊन मिळतात. वाहतुक एकतर्फा सुरु असल्याने याठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. समस्येवर उपाय नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिस प्रशासनाने लक्ष घालून याठिकाणी कायमस्वरुपी वाहतुक पोलिस नेमावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
एमजी रोड सिग्नल ते दहीपूल चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करावा. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सराफ बाजार, दहीपूल, भद्रकाली या परिसरात सायंकाळी पाच नंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याचवेळी टिळकपथ सिग्नल ते दहीपूल या भागात चारचाकी वाहनांचीही वर्दळ वाढते. यामुळे धुमाळ पॉईंट सिग्नलवर पादचारी, दुचाकी चालक अॉटो रिक्षा, चारचाकी वाहने एकाचवेळी आमनेसामने आल्याने सातत्याने वाहतुक कोंडी होत असते. गणेशोत्सव काळात एमजी रोड सिग्नल ते दहीपूल या रस्त्यावर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करावा अशी मागणी होत आहे.
नोकरीच्या निमित्ताने दररोज या रस्त्यावरुन जावे लागते. रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहतुक कोंडीच्या समस्येमुळे दररोज 20 ते 25 मिनिटे उशीर होतो. सांगावे कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पल्लवी जोशी, वाहनधारक, जुने नाशिक