

नाशिक : ओझर विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू व्हाव्यात यासाठी वर्षभरापासून प्रयत्नशील असलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी यासंदर्भात पुन्हा एकदा मंगळवारी (दि. २२) संसदेत थेट प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला विचारणा केली. मात्र केंद्र सरकारकडून अपेक्षित उत्तर मिळू शकले नाही.
लोकसभेत खासदार वाजे यांनी गृह मंत्रालयाला पाच स्पष्ट प्रश्न विचारले. ओझर विमानतळावर इमिग्रेशन तपासणी केंद्र सुरू करण्याबाबत सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ला मंजुरी दिली आहे का? इमिग्रेशन ब्युरोने आवश्यक सुविधांची पूर्तता झाल्याचे मान्य केले आहे का? आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रणाली आणि कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव आहे का? ही सुविधा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सुरू होणार आहे का? आणि या संदर्भात आंतर-मंत्रालयीन समन्वयासाठी कोणती पावले उचलली जात आहेत? असे प्रश्न वाजे यांनी उपस्थित केले.
मात्र, गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या उत्तरात, ओझर विमानतळाची सध्या आंतरराष्ट्रीय नियोजित प्रवासी सेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अपुरी असल्याचे नमूद करत केवळ कार्गो व चार्टर्ड फ्लाइटच्या तपासणीसाठीच सध्या ती जागा उपयोगी असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, काही पोलिस अधिकाऱ्यांना इमिग्रेशन प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती देण्यात आली; मात्र नियमित आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. यासंदर्भात वाजे यांनी ‘ओझर विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होणे ही नाशिककरांची मागणी नाही, तर हक्काची बाब आहे. केंद्र सरकारने या विषयाकडे केवळ कागदोपत्री न पाहता प्रत्यक्ष कृती करावी,’ अशा शब्दांत वाजे यांनी सरकारला सुनावले.
नाशिक हे उद्योग, अध्यात्म, व्यापार, कृषी, पर्यटन या सर्वच बाबतीत महत्वाचे केंद्र आहे. नाशिकमध्ये आंतराष्ट्रीय हवाई सेवा सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना त्याचा फायदा तर होईलच, शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. यासह मुंबई वरील अधिकचा भार देखील कमी होऊ शकेल यासाठी ओझर विमानतळावर आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक असलेला इमिग्रेशन अर्थात प्रवाशांची तापसणी विभागाच ओझर विमानतळावर नसल्याने, आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यास अडचणी येत आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणे हाताळण्यासाठी पुरेशी जागा आणि सुविधा अपेक्षित असतात. त्यात इमिग्रेशनची गरज असते. मात्र, या सुविधेचा याठिकाणी अभाव आहे. याशिवाय विमानतळावरील सध्याच्या धावपट्टीवर केवळ सहा विमानांची पार्किंग क्षमता आहे. त्यामुळे याठिकाणी अधिकच्या धावपट्या उभारण्याची गरज आहे. भविष्यात १२ मालवाहू विमानांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. याशिवाय विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांना शहरात जाण्यासाठी चांगली वाहतुक व्यवस्था नाही. ज्यामुळे गैरसोयीच्या सातत्याने प्रवाशांकडून तक्रारी केल्या जातात. यासर्व असुविधांमुळे नाशिकच्या ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला सातत्याने ब्रेक लागत आहे.