नाशिक : भद्रकाली परिसरात शुक्रवारी (दि. १६) दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी वेळीच सर्व परिस्थिती नियंत्रणात आणल्याने शनिवारी (दि. १७) बाजारपेठ पूर्वपदावर आल्याचे दिसून आले. एरवी प्रचंड वर्दळ असलेल्या या भागात दंगलीमुळे शुकशुकाट निर्माण झाला होता. शनिवारी (दि. १७) मात्र पुन्हा एकदा व्यापारी आणि ग्राहकांची वर्दळ दिसून आली.
भद्रकाली परिसरात दुपारच्या सुमारास अचानक दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्याचबरोबर पोलिसांच्या दंगा नियंत्रक पथकाने धाव घेत, जागोजागी बॅरिकेडिंग करीत नागरिकांना प्रवेश बंद केला होता. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमारसह मेन रोड परिसरात शुकशुकाट निर्माण झाला होता. तसेच ज्या परिसरात दंगल झाली होती, त्या परिसरातील रस्त्यांवर दगड आणि चपलांचा खच पडला होता. पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अनेक संशयित दंगलखोरांना ताब्यात घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने शनिवारी पुन्हा एकदा शहरातील बाजारपेठा पूर्वपदावर आल्याचे दिसून आले. ज्या भागात रस्त्यांवर दगडांचा खच पडला होता, त्या भागातील रस्ते स्वच्छ करण्यात आले. दरम्यान, परिस्थितीवर काही वेळातच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने, नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.