नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल समोरील उड्डाणपुलावर रस्ते साफसफाईसाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर दोन कार एकापाठोपाठ आदळल्याने विचित्र अपघात झाला. यात एक कार दुसऱ्या कारवर चढली होती. या अपघातात दोन्ही कारमधील चार व्यक्ती जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवारी (दि. २) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजीचे काम सुरु आहे. त्यासाठी द्वारकाच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावर साफसफाईच्या कामासाठी (एमएच १५ एचसी १५८६) क्रमाकांचा ट्रॅक्टर उभा होता. त्यावेळी भरधाव वेगाने (आरजे ०४ सीए ६९९८) क्रमांकाच्या कारचालकाने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. धडक बसल्याने कारचा पाठीमागील भाग हवेत होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या (एमएच १५ जेडी ६६३१) क्रमाकांची कार ट्रॅक्टरजवळ येऊन धडकली. त्यामुळे पहिल्यांदा ट्रॅक्टरवर आदळून हवेत असलेल्या कारखाली पाठीमागून आलेली कार फसली. दोन्ही कारमधील चार जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर उड्डाणपुलावर काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती पंचवटी पोलिसांसह पंचवटी वाहतूक शाखेला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातील चौघा जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूकीसाठी रस्ता मोकळा केला.
सफाई कामासाठी थांबलेल्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने भरधाव असलेल्या कारचालकाला अंदाज आला नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे तो ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस जाऊन धडकला. कारच्या पाठीमागील दुसऱ्या कारचालकाही वेगावर नियंत्रण न मिळवता आल्याने तोदेखील ट्रॉलीला जाऊन धडकला. त्यामुळे उड्डाणपुलावरील थांबलेल्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.