नाशिक : 'मी जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो, माझ्या आदिवासीं बांधवांना न्याय मिळायला हवा, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे जाळीवर उडी मारणाऱ्यांना कोणी सर्कस म्हणो किवा तमाशा. परंतु, ज्यांना असा प्रयोग करायचा असेल त्यांनी डबल जाळी लावून उडी मारावी', अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे नाव न घेता टोला लगावला आहे.
विधानभवनातील आंदोलनानंतर नाशिकमध्ये परतलेल्या झिरवाळ यांनी सोमवारी(दि.७) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंचे नाव न घेता आव्हान दिले. राज्य सरकारच्या धनगड दाखले रदद करण्याच्या निर्णयांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. धनगड दाखले रद्द करण्याचा अधिकार सरकारला नसल्याचे सांगत या निर्णयाला आव्हान देवू, असे झिरवाळ यांनी सांगितले. जर धनगडचे दाखले रद्द होऊ शकतात, तर आदिवासी मधील बोगस आदिवासीचे दाखले ही रद्द करा, अशी मागणी होती. तेव्हा सरकारला अधिकार नसल्याचे सांगत सरकारने हात झटकले होते. मग सरकारने हा निर्णय कसा घेतला, असा सवाल कर यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. मधुकर पिचड यांनी आदिवासींचा पक्ष असावा अशी भूमिका मांडली असली तरी, आदिवासी नेते आदिवासींच्या प्रश्नावर एकत्र येत असल्याने पक्ष काढण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मला तंगडं तोडण्याची धमकी देण्यात आली. परंतु,मी तक्रार केली नाही असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.
शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेचा झिरवाळ यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, मी ज्या दिवशी पवार साहेबांपासून बाजुला गेलो तेव्हापासून त्यांच्यासमोर कधीही गेलो नाही. त्यांच्यासमोर जाण्याची माझी हिम्मत होत नाही. त्यांच्यासमोर जाताना खूप प्रगल्भता असावी लागते ती माझ्यात नाही, असे त्यांनी सांगितले. गोकुळ माझं ऐकेल. तो कुठेही जाणार नाही. अजून शर्यत लागायची आहे. शर्यत लागल्यावर तो माझ्या मागे उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
-----