

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामादरम्यान खोकड तलावाच्या मुख्य बांधालगत खोदकाम होत असल्याने तलावाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. तलावाच्या बांधाची जाडी कमी झाल्यास भविष्यात अतिवृष्टीच्या काळात धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
खोकड तलाव हा चांदवडसाठी महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. त्यामुळे या तलावाच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. तलावांचे बांध फुटल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झालेल्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती चांदवडमध्ये होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करत तांत्रिकदृष्ट्या योग्य व सुरक्षित तोडगा काढण्यात येईल. शहरातील नागरिकांची सुरक्षितता, खोकड तलावाची संरचनात्मक सुरक्षितता आणि पर्यावरणीय संतुलनास प्राधान्य दिले जाईल. नगर परिषदेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. शहराच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
वैभव बागूल, नगराध्यक्ष, चांदवड