नाशिक : जकात ठेक्यातील पठाणी वसुलीमुळे यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या 'मन्नुभाई' नामक ठेकेदाराला सफाई कर्मचाऱ्यांच्या आऊटसोर्सिंगचा १७६ कोटींचा ठेका मिळवून देण्यासाठीच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे निविदा प्रक्रियेत विशिष्ठ अटीशर्थी टाकून या ठेकेदाराला पायघड्या घातल्या गेल्या आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेत सुरू असलेल्या या प्रकारामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आऊटसोर्सिंगच्या ठेक्यावरून महापालिकेत वादंग सुरू आहे. २०२० मध्ये ठेका मिळविलेल्या विद्यमान ठेकेदाराच्या कामाची मुदत वर्षभरापूर्वी संपुष्टात आली आहे. गेल्या वर्षभरापासून नवीन निविदेचा वाद सुरू आहे. महायुतीतील तीन पक्षांकडून आपापल्या मर्जीतील ठेकेदारांना पात्र करून देण्यासाठी वेगवेगळ्या अटी शर्ती पुढे केल्या जात असल्यामुळे एक वर्षापासून नवीन ठेक्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होत नव्हती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम दोन दिवस बाकी असताना अचानक घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. आवेश पलोड यांच्याकडील पदभार काढत रातोरात्र निविदेचा बार उडवण्यात आला. यासाठी ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली व मालेगाव येथील ठेक्यामध्ये सहभागी असलेल्या ठेकेदारासाठी निविदेतील अटी बदलण्यात आल्याची चर्चा आहे. यामध्ये साफसफाईचे काम करण्याऐवजी घंटागाडीद्वार किमान ३ लाख घरातून केरकचरा संकलन करण्याचा अनुभव असावा अशी अट टाकली आहे. ५० कोटी रुपयांचा टर्नओव्हर तर १०० कोटीचा नेटवर्थ अशी अट असून ज्यांचा टर्नओव्हर ५० कोटीचा आहे, त्यांचा नेटवर्थ १०० कोटी कसा असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आऊटसोर्सिंगच्या ठेक्यासाठी निविदा प्रक्रिया मूल्याकंन पध्दतीने राबविली जात आहे. सफाई कामासह अन्य कामाच्या अनुभवानुसार गुणानुक्रम निश्चित करून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे.
अजित निकत, उपायुक्त,घनकचरा व्यवस्थापन. नाशिक.