

मालेगाव : मासेमारी करण्यासाठी गेलेले 15 जण गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. त्यांना भारतीय लष्कराच्या एएलएच हेलिकॉप्टरच्या मदतीने 18 ते 19 तासानंतर वाचविण्यात यश आले आहे.
चणकापूर व पुनद धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू असल्याने या दोन्ही धरणातून 15 हजार क्यूसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरू आहे. असे असतानाही संवदगाव शिवारातील नदी पात्रात रविवारी (दि.4) दुपारी मासेमारी करण्यासाठी धुळे व मालेगाव येथील 15 जण गेले होते. त्यावेळी नदीमध्ये पाणी कमी असल्याने ते नदीच्या मध्यभागी असणार्या खडकावर बसून मासेमारी करीत होते. परंतू सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक पाणी वाढल्याने हे सर्वजण अडकून पडले. त्याचवेळी नदी परिसरात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या काही दक्ष नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी त्वरीत मनपाच्या अग्निशमनदलाला माहिती दिली. माहिती मिळताच आग्निशमन अधिकारी डॉ. संजय पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकातील पट्टीचा पोहणारा शकील तैराकी यांनी पुराच्या पाण्यात पोहत जाऊन त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. परंतू नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे शकील याला तेथे पोहचता आले नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले.
रात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचवण्यात अडथळे येत होते. त्याचवेळी नाशिक व धुळे येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला (एसडीआरएफ) पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरा धुळे येथील पथक घटनास्थळी पोहचले. परंतु वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना ही त्यांच्या पर्यंत पोहचता आले नाही. त्यामुळे बचाव कार्य (रेस्न्यू ऑपरेशन) थांबविण्यात आले होते. पालकमंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहमद यांनी घटनेची दखल घेत विचारपूस केली. सोमवारी (दि.5) सकाळी पुन्हा एकदा अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, पुराच्या पाण्यात झालेली वाढ व नदीत असलेल्या खडकामुळे हे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे हे बचाव कार्य पुन्हा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टरची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रांताधिकारी नितीन सदगीर, मनपा आयुक्त रवींद्र जाधव व अग्निशमन दलाचे प्रमुख डॉ. संजय पवार यांनी नाशिक येथील वायुदलाशी संपर्क साधला. त्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान वायुदलाचे हेलिकॉप्टर मालेगावी आले. त्यानंतर त्यांनी पाहणी करुन बचाव कार्य सुरु केले. हेलिकॉप्टरच्या तीन फेर्या मारुन 15 जणांना सुरक्षित स्थळी आणले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडत सामान्य रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली.
उस्मान गणी बद्रुउद्दीन, मुक्तार अहमद नईउद्दीन, जमशेद अहमद नफीस अहमद, नाजीम खान लाल खान, अनीस खान आरिफ खान, मो सऊद राजू अन्सारी, सुफियान अहमद रिजवान अहमद, इकबाल अहमद मुशरफ, वसीम अहमद सलीम अहमद, रिहान अहमद लुकमान अहमद, अख्तर हुसेन जावेद हुसेन (सर्व मालेगाव), अब्दुल जब्बार मो. हुसेन शाह, अब्दुल खलील मो हुसेन शाह, शाबात खान सनीउल्ला, अब्दुल हबीब हक शाह (सर्व धुळे) अशी १५ जणांचा नावे आहेत.