

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरात विजेच्या धक्क्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसताना नयापुरा परिसरात आणखी एका चिमुकल्याचा बळी गेला आहे. बुधवारी (दि. 10) नयापुरा येथील पाच वर्षीय मोहंमद रूशान खलिकुइजमा याचा विद्युत खांबाला आलेल्या करंटमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणाविरोधात रास्ता रोको आंदोलन छेडत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रोशन हा आपल्या घराजवळील गल्लीत खेळत असताना विद्युत प्रवाह उतरलेल्या विद्युत खांबाच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाला.
नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक नूरानी मशिदीजवळ रास्ता रोको आंदोलन सुरू केले. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित विद्युत खांब धोकादायक असल्याची तक्रार बकरी ईदपूर्वीच एमपीएसएल कंपनीकडे करण्यात आली होती. मात्र कंपनीने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने निष्पाप बालकाचा जीव गेला.
बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर तेथेही नातेवाईक, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत त्यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, कलीम दिलावर यांनी सिव्हिल रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांनीही महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व पीडित कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. दरम्यान, विद्युत प्रवाह आलेल्या खांबाची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. मात्र संतप्त नागरिकांनी त्यांना काम करण्यास विरोध करून परत पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित कुटुंबाला 8 लाखांची मदत
स्थानिक माजी नगरसेवक सुहेल मास्टर यांनी मृत बालकाच्या कुटुंबीयांना किमान 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच मदतीची घोषणा होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. नगरसेवक खालिद शेख रशीद, शफीक अँटीकरप्शन व एहसान शेख यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. याविषयी पोलिस उपअधीक्षक कार्यालयात बैठक होऊन एमपीएसएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग यांनी मृताच्या कुटुंबाला 8 लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.