

नाशिक : राज्यात गाजत असलेल्या आदिवासी विकास महामंडळ येथील नोकरभरती घोटाळा प्रकरणात आता तपासास वेग आला आहे. फॉरेन्सिक अहवालामुळे धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. न्यायसहाय्य वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार १०० अधिक परीक्षार्थीनी उत्तरपत्रिकांत गुणफेरफार करत लाभ घेतल्याचा निष्कर्ष समोर आला. यानंतर पोलिस आयुक्तालयाने उमेदवारांची चौकशी सुरू केली आहे. ११ वर्षांनंतर या प्रकरणाने निर्णायक वळण घेतले आहे.
जुलै २०१४ते २०१६ या काळात व्यवस्थापक ते शिपाई अशा ५०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. यात अनियमितता झाल्याचा आरोप होताच संतापाची लाट उसळली होती. उत्तरपत्रिकेत कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना वाढीव गुण दिल्याचा आरोप झाला होता. यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त झाली होती.
यातील अनेक जण कळवण, सटाणा, मालेगाव व देवळ्यातीलच असल्याचे समोर आले. उमेदवारांच्या जबाबातून रॅकेटचा 'मास्टरमाइंड' कोण, आर्थिक व्यवहार कसे झाले, कोणाच्या आशीर्वादाखाली घोटाळा फोफावला, याचा शोध पोलिस घेत आहेत. तपास यंत्रणा आता आर्थिक देवाणघेवाण पुरावे, बँक व्यवहार, आयटी कंपनीची भूमिका आणि अधिकाऱ्यांचे निर्णयप्रक्रियेतील हस्तक्षेप यावर केंद्रित झाले आहे. या घोटाळ्यातील आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
तपासातील महत्त्वाचे टप्पे असे
तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात गुणफेरफाराचे स्पष्ट संकेत नोंदवण्यात आले होते.
महामंडळाचे महाव्यवस्थापक जालिंदर आभाळे यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात महाव्यवस्थापक, अप्पर आयुक्त आणि 'कुणाल आयटी सर्व्हिसेस'च्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
अंतरिम यादीतील ५०० हून अधिक उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची फॉरेन्सिक तपासणी. पोलिस आयुक्तलयात रोज चौकशी