

नाशिक : जिल्हा पुरवठा विभागाने आतापर्यंत ५४ हजार ३६७ मृत लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळली आहेत. मिशन सुधार योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू आहे. त्यात मृत लाभार्थी आढळून आले होते.
शासनाने शिधापत्रिकेत पारदर्शकता आणण्यासाठी मिशन सुधार योजना सुरू केली आहे. यात आधार व पॅनकार्ड लिंक करत शासकीय - खासगी नोकरदार, प्राप्तिकर भरणारे नागरिक तसेच बागायती आणि जिरायती जमीनधारकांची शासनाने निर्देशित केलेल्या निकषानुसार पडताळणी केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात ५ लाख ४ हजार ६९० शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची संख्या आहे.
खऱ्या लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळाला पाहिजे, या उद्देशाने शासन मिशन सुधार योजना राबवत आहे. याद्वारे शिधापत्रिकेवरील मृत लाभार्थ्यांची नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यावर वाचणारा धान्याचा लक्ष्यांक खऱ्या अर्थाने गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर त्यांच्या पात्रतेनुसार धान्य पुरवठा सुरू किंवा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मृत लाभार्थ्यांची खातरजमा केल्यानंतरच नावे कमी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.