

विकास गामणे
नाशिक : लेक लाडकी अभियानापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत विविध पावले उचलणाऱ्या महाराष्ट्र शासनाने आता शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या नावात आता वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावणे अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे केवळ कागदोपत्री बदल होणार नसून, समाजात मातृशक्तीचा सन्मान वाढवण्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांचे नाव लिहिताना विद्यार्थ्याचे नाव-वडिलांचे नाव-आडनाव अशी पद्धत होती. मात्र, नव्या निर्णयानुसार आता विद्यार्थ्याचे नाव-आईचे नाव-वडिलांचे नाव आणि आडनाव असा क्रम निश्चित करण्यात आला आहे. सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळांना हा नियम बंधनकारक असणार आहे. शाळेत प्रवेश घेताना आता केवळ वडिलांच्या नावावर अवलंबून न राहता, आईचे नाव नोंदवणे अनिवार्य झाले आहे. शाळेचे हजेरीपत्रक (मस्टर), गुणपत्रक (रिझल्ट कार्ड), शाळा सोडल्याचा दाखला (एल.सी.) आणि प्रवेश निर्गम उतारा या सर्व अधिकृत कागदपत्रांवर आता आईच्या नावाचा उल्लेख अग्रक्रमाने दिसेल.
लिंगसमतेचा नवा अध्याय
या निर्णयामागे केवळ प्रशासकीय बदल नसून, एक सामाजिक दृष्टिकोन आहे. आई ही मुलाची पहिली गुरू असते. तिला समाजात आणि अधिकृत दस्तऐवजात योग्य सन्मान मिळावा, ओळख मिळावी आणि लिंगसमतेचा संदेश घराघरात पोहोचावा, या हेतूने राज्य शासनाने हे धोरण आखले आहे. सिंगल पेरेंट किंवा आईकडे राहणाऱ्या पाल्यांच्या बाबतीत येणाऱ्या तांत्रिक अडचणीही या निर्णयामुळे दूर होण्यास मदत होईल.