नाशिक : महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील, असे सांगत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी अविरत काम करू, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
ते म्हणाले की, या स्मारकासाठी संकल्प चित्र तयार करण्यात आल्यानंतर पुतळे उभे किंवा अर्धाकृती करण्यात यावेत यावर विचारविनिमय करण्यात आला. आजवर विविध ठिकाणी उभे पुतळे निर्माण केले गेले आहे. ते अतिशय उंच असल्याने त्याची निगादेखील राखणे कठीण होते. त्यामुळे हे पुतळे अतिशय नेटके वाटावे त्याची व्यवस्थित निगा राखली जावी यादृष्टीने समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून ब्राँझ धातूचे देशातील सर्वाधिक उंचीचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवसापासून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, शनिवारी (दि.28) त्यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात उभारण्यात आलेल्या क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते विशेष विमानाने येऊन उपस्थित राहिले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ, वस्तू सल्लागार श्याम लोंढे, नागरे, पंकज काळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.