

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर व जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने सिंहस्थ पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. शहरातील रस्ते रुंदीकरण, पायाभूत गटार आणि इतर उपयुक्तता कामांचा वेग मंदावला आहे. पावसाचा सिंहस्थ विकासकामांवर परिणाम होत असल्याने कंत्राटदारांसह प्रशासनाचाही चिंता वाढली असून, हजारो कोटींच्या प्रकल्पांवर पावसाने संकट उभे केले आहे.
महानगरपालिका आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने शहरात २८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. यात नाशिकरोड, द्वारका, पंचवटी, रामकुंड, त्र्यंबकेश्वर रस्ते, घाट रस्ते, रिंगरोड आणि मुख्य महामार्गांच्या रुंदीकरणाचा समावेश आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात संततधारेमुळे बांधकाम स्थळांवर पाणी साचले आहे.
खोदकाम, काँक्रिटीकरण आणि ड्रेनेज कामे अडचणीत आहेत. अनेक ठिकाणी माती ढासळण्याच्या भीतीने यंत्रसामग्रीची हालचाल थांबली आहे. प्रशासनाने पूर्व मान्सून तयारी म्हणून काही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपा आणि कुंभमेळा प्राधिकरणासमोर निर्माण झाले आहे.
नदीकाठावरील कामांना धोका ?
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या साठ्यात वाढ होऊन गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्याची वेळ येऊ शकते, अशा परिस्थितीत गोदावरी नदीकाठावर सुरू असलेल्या घाटांच्या कामांना फटका बसण्याची शक्यता आहे.
गौरी पटांगण परिसरात डेब्रिज
गोदावरी काठावरील गौरी पटांगण परिसरात भुयारी गटार कामादरम्यान खोदकामाचा निघालेला मलबा आणि डेब्रिज पटांगण परिसरातच पडून आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढल्यास या डेब्रिजचा प्रवाहाला अडथळा होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे.