

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी (दि.२२) दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावत वडांगळी, देवपूर, मेंढी, फर्दापूर, धारणगाव तसेच परिसरातील गावांना चांगलाच दिलासा दिला. सलग दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवारात नवचैतन्य संचारले आहे.
विशेष म्हणजे, या भागात जोरदार पाऊस कोसळत असताना सिन्नर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे अनेक रस्ते आणि सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. लहान नाले, ओढे आणि जलस्रोतांमध्येही पाण्याची आवक वाढली.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी या सरींचे स्वागत केले असून, उष्णतेपासूनही नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. जून महिना संपत आला, तरी तालुक्याच्या अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पूर्व पट्टयात झालेल्या या पावसामुळे आशेचा किरण दिसू लागला आहे. तरीही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, एक-दोन दिवसांचा पाऊस पुरेसा नाही; आगामी काळात सातत्याने आणि भरपूर पाऊस होणे आवश्यक आहे.
शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
वडांगळी, देवपूर, मेंढी, फरदापूर, धारणगाव आणि शहरापासून जवळच असलेल्या गुरेवाडी परिसरात पाऊस झाला. शहरातील नागरिकांना मात्र अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जलसाठ्यांवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आजच्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आणि शिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र शेती, पाणीसाठे आणि जनावरांच्या चाऱ्याच्या दृष्टीने अजूनही नियमित आणि समाधानकारक पाऊस होणे अत्यंत गरजेचे आहे. निसर्गाने अशीच साथ दिली, तर ग्रामीण भागाला मोठा आधार मिळेल.
- ज्ञानेश्वर गडाख, शेतकरी, देवपूर