

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस असलेल्या गुरुपौर्णिमेचा उत्सव नाशिक जिल्ह्यात यंदा मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार असून, यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटीतील काळाराम मंदिरासह जिल्ह्यातील विविध मठ, आश्रम आणि स्वामी समर्थ केंद्रांमध्ये विशेष पूजा, अभिषेक, नामस्मरण, जप आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा यंदा बुधवारी (दि. २९) आहे. पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा तिथीची सुरुवात २८ जुलै रोजी सायंकाळी ६.२१ ला होऊन ती २९ जुलै रोजी रात्री ८.०७ पर्यंत राहणार आहे.
त्यामुळे तिथीच्या मान्यतेनुसार २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंतीही साजरी केली जाते. त्यामुळे या दिवसाला 'व्यासपौर्णिमा' किंवा 'व्यासपूजा' असेही म्हटले जाते.
गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी स्नान करून भगवान विष्णू, भगवान दत्तात्रेय, महर्षी वेदव्यास आणि गुरूंचे पूजन करण्याची परंपरा आहे.
"गुरुपौर्णिमेच्या दिवशी जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, चांगल्या संस्कारांचा स्वीकार करणे आणि आत्मचिंतन करून अध्यात्मिक प्रगतीचा संकल्प करणे शुभ मानले जाते. गुरुकृपा, ज्ञान, यश आणि मानसिक शांतता प्राप्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने पूजा, जप आणि दान केल्यास विशेष पुण्य लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे."
— डॉ. नरेंद्र धारणे, धर्म- ज्योतिष तज्ज्ञ
समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ झाला असून यामध्ये मंगळवारी (दि. २८) श्री सद्गुरू लीलामृत ग्रंथाचे पारायण तसेच विविध भजनी मंडळांच्या भजनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य सोहळा बुधवारी (दि. २९) गंगापूर रोड येथील चैतन्यनगर मठात होणार आहे. समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन बुधवारी (दि. २९) करण्यात आले आहे.
तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये श्री नादब्रह्म भजनी मंडळ, आनंदी भजनी मंडळ, समर्थ अभ्यास मंडळ आणि दुर्गा देवी भजनी मंडळ यांच्या भजनांचा समावेश आहे. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान पुण्याच्या सुप्रसिद्ध कीर्तन चंद्रिका मानसी श्रेयस बडवे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी ६.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत १२ तास अखंड नामस्मरण चालणार आहे.