नाशिक : केवळ स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी अनिल देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत, असा पलटवार करत देशमुख यांच्याकडे फडणवीस यांच्याविरोधातील पुराव्यांचा पेनड्रॉइव्ह असेल तर तो त्यांनी दाखवावाच, असे थेट आव्हान भाजपचे नेते तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप पोलिस दलातील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी केला असून, याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशमुख यांनी मात्र वाझे यांचे आरोप फेटाळून लावत फडणवीस यांची ही नवी चाल असल्याचे म्हटले आहे. फडणवीस यांच्या विरोधात आपल्याकडे सर्व पुरावे पेनड्राइव्हमध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला. यावरून राज्याचे राजकारण तापले असून, भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने शनिवारी (दि.३) नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना देशमुख यांच्यावर पलटवार केला. महाजन म्हणाले की, वाझेंनी केलेला आरोप हा आताचा नाही, तो आधीचा आहे. त्यांनी या आधीही हा आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा नोकरीत घेतले होते. त्यांना परत का घेतले? देशमुख म्हणतात पेनड्राइव्ह आहे तर तो त्यांनी दाखवावा. आमच्याकडचा पेनड्राइव्ह आम्ही विधानसभेत दाखवला आहे. खोटे आरोप करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यात तेच फसले आहेत. आता या प्रकरणी काय करायचे हे यंत्रणा ठरवतील. आमच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले होते, असेही त्यांनी म्हटले.
सचिन वाझेंनी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचे नाव असल्याचे वाझेंनी म्हटले आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, त्यांनी काय पत्र लिहिले आहे हे मला नक्की माहीत नाही. पण, त्यात नाव असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. कोणी कोणी काय काय कारनामे केले आहेत? किती पैशांच्या मागण्या केल्या? किती खंडण्या मागितल्या? याची चौकशी व्हावी, असे नमूद करत स्वतःवरील आरोप सिद्ध होत असल्याने त्यांना आता यातना होत आहेत. म्हणून फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले जात आहेत, असेही महाजन म्हणाले.
सचिन वाझेंच्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. अँटिलिया प्रकरणातील आरोपी कुठे आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांना क्लीन चिट दिली आहे. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. यावर महाजन यांनी, संजय राऊत भडक बोलतात. त्यांच्या जिभेला हाड नाही. राऊत यांना आता कोणी 'सिरियस' घेत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
नाशिक- मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासाला आठ- आठ तास लागत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेत याची गंभीर दखल घेतली आहे. येत्या महिनाभरात या रस्त्याचे चित्र बदलेल, असा दावा महाजन यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी निश्चितीबाबत सुरू असलेल्या सर्व्हेबाबत बोलताना ते म्हणाले की, सर्व्हेबरोबरच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच उमेदवारी निश्चितीचा निर्णय व्हायला हवा.