जळगाव : महाराष्ट्र बदनाम झाला, तो देवेंद्र फडणवीस आल्यापासून. महाराष्ट्राची वाट लागली, महाराष्ट्रातले राजकारण गढूळ झाले या सर्वांचे जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, अशी टिका खासदार संजय राऊत यांनी केली.
जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असताना विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, फडणवीस गृहमंत्री असल्यापासून पोलिसांची भूमिका ही कायम संशयास्पद आहे. आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव असतो. त्यामुळे पोलिसांची आम्हाला दया येते. राज्यांमध्ये लहान मुलांवर अत्याचार, बलात्कार वाढले आहेत याची जबाबदारी घेऊन त्यांनी पदाचा त्याग करायला पाहिजे, अशी खरमरीत टिका त्यांनी केली.
तसेच शनिवारी (दि. २४) महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची घोषणा केल्याचेही त्यांनी सांगितले.बदलापूर घटनेवर त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, गिरीश महाजन बदलापूर येथे गेले होते. तेथील जनतेने गिरीश महाजन यांना जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर ते देऊ शकले नाही. सत्ताधारी असले तरी जनतेचा रोषाचा ते सामना करू शकले नाहीत. जेव्हा जनतेचा सामना केला जात नाही तेव्हा विरोधक राजकीय पोळी शेकत असल्याचा आरोप केला जातो, असे त्यांनी सांगितले.