

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील म्हाडा घरकुल फसवणूक प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपविण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या विशेष पथकामार्फत (एसआयटी) सुरू आहे. तपासाचा अहवाल पुढील १५ दिवसांत प्राप्त होणार असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार ईडीमार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
म्हाडा नियमानुसार ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहप्रकल्पांत २० टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र नाशिकमधील काही बांधकाम व्यावसायिकांनी हा नियम टाळण्यासाठी बनावट कागदपत्रे, खोटे शिक्के व सह्यांचा वापर करीत प्रकल्पांचे क्षेत्रफळ कमी दाखविले.
काही प्रकरणांत प्रकल्प २०१३ पूर्वीचे असल्याचा खोटा आभास निर्माण करीत शासनाची दिशाभूल केल्याचे तपासात उघड झाले आहे. भूमी अभिलेख विभागाने १२८ प्रकरणांची तपासणी केली असता, ४९ प्रकरणांत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाणे येथे संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भूमी अभिलेख, महसूल विभाग आणि म्हाडा या तिन्ही यंत्रणांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, काही संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळविला असला, तरी कारवाईची प्रक्रिया सुरूच आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या महसूलमंत्री बावनकुळे यांना या संदर्भात विचारले असताना, त्यांनी दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.
गरिबांचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. कितीही मोठी व्यक्ती असली, तरी त्याच्यावर कठोर कारवाई होईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करत गोरगरिबांना त्यांचा हक्क मिळवून संबंधित देण्यासाठी व्यावसायिकांकडून मालमत्ता जप्त करण्याचाही इशारा त्यांनी दिला. या घोटाळ्यामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.