

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाले भरून वाहत आहेत. गोदावरी नदीसह जिल्ह्यातील विविध नद्यांच्या काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. मंत्री महाजन यांनी बुधवारी (दि. ८) दुपारी शहरातील रामतीर्थ परिसरास भेट देऊन पाहणी केली.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल, असेही आवाहन मंत्री महाजन यांनी केले.
महापौर आडके आहेर, आयुक्त खत्री यांनी गोदावरी नदी पूर नियंत्रणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. गोदावरी नदीबरोबरच नंदिनी नदीलाही रात्री पूर आला होता. या पूरस्थितीचीही मंत्री महाजन यांनी पाहणी केली. त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नल, सातपूर येथील शाहूनगर परिसरात ज्या घरांमध्ये नंदिनी नदीचे पाणी शिरले होते, तेथील नागरिकांची मंत्री महाजन यांनी भेट घेऊन त्यांना आवश्यक ती मदत महानगरपालिकेकडून करण्याचे निर्देश दिले आहेत.