

देवळाली कॅम्प (नाशिक) : शहरात कोणीही उपाशीपोटी झोपू नये, या उदात्त हेतूने 28 वर्षांपूर्वी महाराज बिरमानी व त्यांच्या परिवाराने रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरू केलेल्या पुरी-भाजी सेंटरच्या माध्यमातून आजपर्यंत 1 कोटी 50 लाख पुरी- भाजींचे वाटप झाले असून, कोरोना महामारीतही या केंद्राने केलेली कामगिरी उज्ज्वल ठरली आहे. रोटरीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील या केंद्राला मिळाला आहे. या सेंटरच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले
सन 1997 मध्ये तत्कालीन रोटरी अध्यक्ष स्व. डॉ. अरुण स्वादी यांच्या संकल्पनेनुसार शिवानंदा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे संचालक महाराज बिरमानी, रोमा बिरमानी, (स्व.) रेणुदीदी यांनी या सेंटरची उभारणी केली. 28 वर्षांत येथील पुरी- भाजीमुळे एकाही व्यक्तीला त्रास झाला नाही. अतिशय रुचकर व किफायतशीर दरात ही पुरी- भाजी उपलब्ध करून दिल्यामुळे श्रमिकांच्या पोटाची भूक भागवत आहे. या केंद्राने इगतपुरी- त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यांतील 28 खेड्यांमध्ये मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याचा उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू केलेला आहे.
येथील केंद्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन माजी खासदार (स्व.) राजाभाऊ गोडसे यांच्या माध्यमातून संसरी तसेच नाशिकरोड येथे याची शाखा सुरू करण्यात आली. कॅन्टोन्मेंट रुग्णालय, प्राथमिक शाळा, बिटको रुग्णालय, मतिमंद मुलांच्या शाळा येथे दररोज मोफत पुरी-भाजीचे वाटप केले जाते. दरवर्षी होणार्या लष्कर भरतीसाठी हजारो युवकांसाठीही सेवा मोफत दिली जाते. महाराज बिरमानी यांच्या प्रयत्नांना व्यवस्थापकीय सेवक ज्ञानेश्वर शिंदे, श्यामराव बलकवडे, मनीषा शिंदे, सीता थापा, सुरेखा बनसोडे, पौर्णिमा ताजनपुरे, रागिणी हाबडे, समीर मलिक आदी सहकार्यांची विशेष साथ लाभत आहे. केंद्राच्या वा वर्धापन दिनसोहळ्यास रोटरी प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, मुरली राघवन, जे. सुंदररामण, डॉ. पुष्कर जोशी, सुभाष मोरे, मोहन कामत, ब्रिगे. अनिल गर्ग, विजय शेट्टी यांच्यासह अण्णा ग्रुप व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.