देवळा ; देवळा येथील विद्यानगर परिसरातील अंगणवाडी क्रमांक दहा व चार पावसाने गळत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. या अंगणवाडीची दुरावस्था बघून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी नवीन अंगणवाडी बांधकामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
देवळा शहर व तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून, देवळा शहरातील विद्यानगर परिसरात अंगणवाडी क्रमांक दहा व चार ह्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या जुन्या खोल्यांमध्ये सुरू आहेत. त्या खोल्या जुन्या असल्याने मोडकळीस आल्या आहेत. त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात सद्या पाऊस सुरू असल्याने त्या गळायला लागल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. तसेच पावसाचे पाणी ह्या अंगणवाड्यात शिरल्याने त्या बंद असून आत मधील पोषक आहाराचे व इतर साहित्य पाण्याने भिजत आहे. अशी तक्रार येथील स्थानिक नागरिकांनी केली असून, याकडे लक्ष देऊन याठिकाणी नवीन अंगणवाडी साठी बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.