नाशिक : दसरा - दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्यतेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयातशुल्क वाढवल्याने खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. सोयाबीन, सूर्यफूल, पामतेलाचे भाव लिटरमागे साधारण २० ते ३० रुपयांनी वधारल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. करडई, शेंगदाणा आणि सरकी तेलही प्रतिलिटर 10 ते 20 रुपयांनी महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. (Expensive edible oil 2024)
महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गतवर्षी कच्च्या तेलावरील आयातशुल्क रद्द केले होते. त्यामुळे गगनाला भिडणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती खाली आल्याने गृहिणींसह हॉटेलचालकांना दिलासा मिळाला होता. जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमती स्थिर होत्या. मात्र, दरवर्षी सणासुदीत तेलाची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे तेल बाजारात तेजी येते. सध्या दसरा - दिवाळी तोंडावर आली असताना, केंद्राने कच्चे सूर्यफूल, कच्चे पाम तेल आणि कच्चे सोयाबीनवरील आयातशुल्क २० टक्क्यांनी वाढवल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.
सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किमती लिटरमागे २० रुपयांनी वाढल्या असून, करडी, शेंगदाणा, सरकी, मोहरीचे भावदेखील १० ते २० रुपयांनी वाढल्याचे तेल विक्रेत्यांनी सांगितले. दरवर्षी सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाढीचा भडका उडतो, हे काही नवीन नाही. मात्र लिटरमागे तब्बल २० ते ३० रुपयांच्या दरवाढीने चटका बसला आहे. याचा महिन्याच्या बजेटवर परिणाम जाणवत आहे.
केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयातशुल्क वाढल्याने सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किमती वाढल्या आहेत. करडई, शेंगदाणा आणि मोहरी तेलही महागले आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
सागर देशमुख, खाद्यतेल व्यापारी, नाशिक.
सरकारने वाढविलेल्या करवाढीमुळे आता ११० रुपये किलोला मिळणारे सोयाबीन तेल आता १३० रुपयांना झाले आहे, तर शेंगदाणा तेल १७५ वरून १९० झाले आहे. सूर्यफूल तेल हे ११५ वरून १४० झाले आहे. लिटरमागे साधारण २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे.