

येवला : राज्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (दि. २) येवला येथे अचानक भेट देत बीएलओंच्या कामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान काही बीएलओंच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच प्रत्येक घराला भेट देऊन मतदारयादीचे अचूक पुनरीक्षण करून मोहिम प्रभावीपणे पूर्ण करा अशा सूचना त्यांनी बीएलओंना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात विशेष मतदारयादी पुनर्निरीक्षण मोहीम सुरू आहे. त्यामध्ये प्रत्येक मतदारांसाठी दोन प्रत फॉर्म दिलेला आहे. प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना सहायक मतदान केंद्र अधिकारी म्हणून नेमून दिले आहेत.
यामध्ये निवडणुकाच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन प्रत्येकाचा फॉर्म त्यांच्या हातात देऊन त्यांच्याकडून २००२ च्या यादीमध्ये नाव बघून त्यांचे लाईव्ह फोटो काढून मतदारयादीला अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आपण व्यवस्थितपणे काम करावे, कोणत्याही प्रकारच्या अडचणी, अफवा, तक्रारी न करता तालुक्यामध्ये या मोहिमेचे काम पूर्ण करावे, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बजावले.
टंचाईचा घेतला आढावा
तालुक्यातील पाणीटंचाई, रोजगार हमी योजना, घरकुल, दारूबंदी आदींसह तालुक्यात वारंवार होणारे अपघात होणारे स्पॉट शोधून त्यावर उपाय करणे तसेच अवैध वाळू, घाट, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे ई-पीक पाहणी आदींचा सखोल आढावा जिल्हाधिकारी यांनी बैठकीत घेतला.