नाशिक : विधानसभेच्या जागावाटपांबाबत सर्वच पक्ष दावा करत असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीचा निर्णय जसा दिल्लीत होतो तसाच महायुतीच्या बाबतीत आधी राज्यस्तरावर चर्चा केली जाईल. नाहीच प्रश्न सुटला तर मग आम्हाला देखील हा प्रश्न सोडवायला दिल्लीत जावे लागेल, असे वक्तव्य केले आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. २) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यामुळे राज्याच्या जागावाटपाबाबत महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हींचे प्रश्न दिल्लीतच सुटणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
मराठा, ओबीसी तसेच कांदा प्रश्नावर आंदोलन करताना आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेण्याचे आपण सरकारला सांगितले होते. त्यानुसार आता हे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये वित्तहानी किंवा जिवीतहानी झालेल्यांचे गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच सचिन वाझे प्रकरणाबाबत मला अद्याप काहीही माहीत नाही. याप्रकरणी गृहमंत्री फडणवीस साहेब कोण खरे बोलते किंवा खोटे बोलते हे तपासतील.
नाशिक - मुंबई महामार्गाची कामे अत्यंत संथगतीने सुरू असून, झिगझॅग चालावे लागते. अनेकदा खड्ड्यांमुळे ट्रेलर अडकतात. भिवंडी बायपासचे कामही सुमार दर्जाचे आहे. प्रवास करताना हाडे खिळखिळी होत आहेत. मलाही त्याचा त्रास झाला. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी काही हजार कोटी रुपये खर्च करून रस्ता काँक्रिटीकरण करणार असल्याचे सांगितले होते. ‘ते काम नंतर करा, आधी खड्डे तर बुजवा’, अशी व्यथा देखील भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्ग अत्यंत जुना असून, त्यावर नाशिकची वाहतूक चालत नाही, तर आग्र्यापर्यंतची वाहतूक चालते. या महामार्गाच्या अवस्थेमुळे नाशिकचे नाव बदनाम होत असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मुळातच पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पूल, भुयारी मार्ग अशी कामे व्हायला हवी हाती ती झाली नसल्याचे भुजबळांनी यावेळी सांगितले.