नाशिक : मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर आंतरवली सराटीमधून मराठा नेते मनोज जरांगे निघून गेले होते. मात्र, रात्री २ वाजता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्याला पुन्हा आणले आणि उपोषणस्थळी बसविल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे रोहित पवार, राजेश टोपे काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मंत्री भुजबळ म्हणाले, ज्यावेळी आंतरवली सराटीमध्ये दगडफेक झाल्यानंतर लाठीमार झाला तेव्हा मनोज जरांगे तिथून निघून गेले होते. परंतु, रात्री २ वाजता रोहित आणि टोपे यांनी जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवले. यानंतर तिथे शरद पवार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. पवार आणि ठाकरे यांना पोलिसांवर दगडफेक झाल्याची कल्पना नव्हती. आंदोलकांच्या दगडफेकीत 80 पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रोहित आणि टोपेंनी रात्री केलेल्या या कृत्यामुळेच प्रसारमाध्यमांमध्ये केवळ एकच बाजू आली. त्याचाच फायदा जरांगे यांना झाला आहे. मात्र, तेथे झालेल्या दगडफेकीत रोहित, टोपे यांचा सहभाग असल्याचे आपल्याला तेथील स्थानिकांनी सांगितल्याचा दावाही यावेळी भुजबळ यांनी केला.
माझे म्हणणे एवढेच आहे की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मात्र, जरांगे कधी मंडल आयोग संपून टाकणार, तर कधी त्याच मंडल आयोगाद्वारे आरक्षण द्या म्हणतात. यावरून ते अक्कलशून्य असल्याची टीका भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर केली आहे.