

नाशिक: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा नको त्यांना झालेला आहे. काही प्रमाणात हे खरे आहे. मात्र यावेळी नियम काही वेगळे आहेत. त्यात एका घरात दोन महिलांना देता येत नाही, मोटार गाडी असेल तर त्यांना देता येणार नाही. गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे. जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले नावे काढले पाहिजे, अशी टिप्पणी करत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
येवला येथे रविवारी (दि.१२) प्रसार माध्यमांशी बोलत होते. जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही, ते आता मागण्यात येऊ नये. मागे जे झाले ते लाडक्या बहिणींना अर्पण. मात्र याच्यापुढे लोकांना सांगावे, जे नियमित नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावे. अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
कृषीमंत्री कोकाटे यांनी गरज वाटली तर मी भुजबळ यांची भेट घेईल. मला जर वाटले त्यांचा सल्ला घ्यायचा आहे, तर मी भेट घेईल. पण भुजबळांचा सल्ला घ्यावा असे अजूनतरी मला वाटत नाही, अशी टिप्पणी केली होती. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, हा विषय संपला आहे. माझ्याविरुध्द कोणी काही बोलले नाही तर मीसुध्दा कोणाविषयी बोलणार नाही. सर्वांना शुभेच्छा, अशा शब्दात कोकाटे यांच्या वक्तव्यावर अधिक बोलणे भुजबळ यांनी टाळले.