

नाशिक : राजकीय पक्षरूपी घर बांधायला घेतल्यावर सगळे वेगवेगळी कामे करतात. त्यासाठी वेगवेगळे घटक कार्यरत राहतात. त्या प्रक्रियेत मी काहीतरी योगदान दिले आहे. तथापी घर बांधण्यात सहभागी झालेल्याने अन्याय झाला तर खंत व्यक्त करण्यात काय चुकले, असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी केला. काही लोक या घरातून त्या घरात असे घरोबे करतात, त्यांना माझे दु;ख काय कळणार, असा टोला भुजबळ यांनी यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
शरद पवार यांच्या बरोबरीने राष्ट्रवादीचे घर बांधले. परंतु, त्याच घरामध्ये अन्याय झाल्याने मनाला दु:ख वाटले. हीच माझी खंत होती आणि त्यातूनच 'जहा नहीं रैना, वहा नहीं रहना' अशा भावना व्यक्त केल्या होत्या, असे सांगत, मंत्री भुजबळ यांनी 'मैं देरसे आया हू, मैं दुरूस्त आया हू' अशी शेरोशायरी करत, उपमुख्यमंत्री अजित पवारांवरील नाराजी दूर झाल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री भुजबळ हे जिल्हा दौऱ्यावर होते. गुरुवारी (दि. 22) राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथे त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयवंत जाधव, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, नाना महाले, गोरख बोडके, बाळासाहेब कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजूरकर, संजय खैरनार, डॉ. योगेश गोसावी, प्रा. ज्ञानेश्वर दराडे आदी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले की, राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत. आतापर्यंत माझा 10 वेळा शपथविधी झाला. माझ्याबाबत सापशिडीचा खेळ झाला परंतु, हा खेळ मी लहानपणी खेळलो आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कधीकधी आपल्या आयुष्यात वाटत नाही ते घडत असते. जे स्वप्नात बघतो ते प्रत्यक्षात होत नाही, जे घडते ते स्वप्नात येत नाही असे सांगत, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे माझे राजकारणातील गॉडफादर आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
भुजबळांचे भुज 'बळ' हे तुम्ही आहात, असे सांगत 'मला मंत्री पदावरून डावलल्यानंतर मी नाराजी व्यक्त केली होती. नंतर नेत्यांनी ठरवले दुरुस्ती व्हायला पाहिजे. त्यानंतर गेल्या मंगळवारी नेत्यांची बैठक झाली. त्यात मंत्री पदाची शपथ घ्यायची असे ठरले' असे भुजबळांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माझ्या मंत्री पदासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी मंत्री भुजबळ यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरीत भुजबळ यांचे स्वागत केले. मात्र, राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या संवाद मेळाव्याला मंत्री कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह जिल्ह्यातील एकही आमदार उपस्थित नव्हते.
निवडणुकीत सांगितले होते की, ओबीसी आमचा डीएनए आहे. शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण देण्याचे ठरवले तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत राहिलो. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना घोषणा केली, आज त्यांच्या सोबत आहोत. अजित पवार यांनी फुले- शाहू- आंबेडकर यांच्या नीतीला अनुसरणार असल्याचे सांगितले. तो मार्ग म्हणजे सर्वांना समान अधिकार. महिला- पुरुष यांना एक अधिकार आहे. आगामी निवडणुका जिंकायच्या असतील, तर कामाला लागा. सर्वांना संधी द्यावी लागेल. लहान घटकातला असेल, तरी संधी देऊ. कोणी म्हणेल तो पडणार, पडला तरी चालेल पण संधी द्यावी लागेल, असे स्पष्ट करुन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याच्या सूचना केल्या.