आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून सुमारे दोन कोटी भाविक व साधू- महंत उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या गर्दीच्या व्यवस्थापनात होणारी छोट्यात- छोटी चूक 2003 च्या दुर्घटनेला आमंत्रण देणारी ठरू शकते.
येथे 2003 मधील कुंभमेळ्यात दुसऱ्या पर्वणीला 27 ऑगस्ट 2003 रोजी पंचवटीत चेंगराचेंगरी होऊन 29 भाविकांना जीव गमावावा लागला. या चुकीसाठी प्रशासनाकडून साधूंकडे उंगलीनिर्देश करण्यात आले होते. या घटनेमागील कारण काहीही असले, तरी अशी घटना पुन्हा होणार नाही यासाठी त्या घटनेमागची कारणे शोधून प्रभावी उपाय करणे क्रमप्राप्त ठरते. प्रामुख्याने नाशिक आणि त्र्यंबक दोन्ही कुंभमेळ्यांच्या ठिकाणी मोकळ्या जागांचा अभाव आहे. आगामी मेळ्यात गर्दीचे प्रमाण 2003 च्या तुलनेत दुप्पट वाढणार असल्याने या काळात गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान असणार आहे. 2023 -24 मध्ये नाशिक येथे 40 हजार साधूंनी, तर 1 कोटी 20 लाख भाविकांनी हजेरी लावली होती. त्र्यंबकेश्वरला 1 लाख 30 हजार साधू, तर 40 हजार भाविकांची नोंद झाली होती. 2014 मध्ये नाशिकला 1 कोटी 30 लाखांहून अधिक भाविक व त्र्यंबकला 30 लाख भाविक आले होते. यंदा गर्दीचा हा आलेख दोन कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला कुंभमेळा नियोजनात गर्दीचे व्यवस्थापन केंद्रस्थानी ठेवावे लागणार आहे.
नाशिकला गोदाघाटावर, तर त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थावर भाविकांची गर्दी उसळते. यंदा ही गर्दी लाखोंच्या संख्येने वाढत असली, तरी दोन्ही ठिकाणची जागा खूपच कमी आहे. शिवाय जाण्या-येण्याच्या मार्गावर अरुंद रस्ते, अपघात ठिकाणे तसेच अफवा पसरविणे, गर्दी होणारी ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी प्रभावी उपाय राबवावे लागणार आहेत.
गर्दीचे व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याबाबत गत कुंभमेळ्यातील पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासन यांचे नियोजन तसेच प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे आगामी नियोजन केले जात आहे. यावेळी टॅक्नॉलाॅजीचा अधिक-अधिक वापर केला जाणार आहे. मोबाइल लोकेशनद्वारे कुठे जास्त गर्दी आणि कुठे कमी याबाबी नियंत्रित केल्या जातील. 2015-16 प्रमाणेच 2027 चा कुंभमेळा निर्विघ्न पार पडेल.
डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक