इगतपुरी (नाशिक) : मुंबईसह कल्याण ते कसारा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने याचा मध्य रेल्वेवर या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. या अतिवृष्टी पावसामुळे उंबरमाळी येथील रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर वाशिंद जवळ ट्रॅकवर वाळू माती जमा झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी व मुंबईहून नाशिककडे येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
शहापूर तालुक्यात दमदार पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून शहापूर तालुक्यात एनडीआरएफचं पथक दाखल झाले आहे. पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी येथे रद्द करण्यात आली असून चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. अनेक रेल्वे गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. प्रवाशी मुंबई आणि नाशिकला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घेत आहेत. वाहतूक सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तास लागणार असल्याची शक्यता मध्य रेल्वे प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी येथे रद्द करण्यात आली असून चाकरमान्यांचे हाल होत आहेत. तर अनेक रेल्वे गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. प्रवाशी मुंबई व नाशिकला जाण्यासाठी खाजगी वाहने करत आहेत. तर पावसामुळे काही रेल्वेगाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून माघारी वळवण्यात येत आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
रेल्वे ट्रॅकवरील वाळू व माती काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरु असुन वाहतूक सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तास लागणार असल्याची शक्यता मध्य रेल्वे प्रशासनाकडुन वर्तविण्यात येत आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकातून डाऊन मार्गाची गोरखपूर एक्स्प्रेस ही पहिली गाडी नाशिकरोडच्या दिशेने रवाना झाली आहे.
तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या मनमाड, नाशिकरोड, देवळाली, इगतपुरी आदी रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या. रविवार (दि.७ जुलै) सकाळच्या सुमारास रेल्वे वाहतुक विस्कळीत झाल्याने प्रवाशी व चाकर मान्यांचे मोठे हाल झाले आहेत.