

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात प्रकरणातील सुनावणीत आरोपीने घेतलेले मौन आता चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्या सुनावणीवेळी न्यायालयात काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया देणारा खरात यावेळी मात्र पूर्णपणे गप्प राहिल्याचे दिसून आले. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नालाही त्याने केवळ 'नाही' असे संक्षिप्त उत्तर देत पुढील कोणतीही भूमिका मांडण्यास असमर्थता दर्शवली.
त्यामुळे न्यायालयीन वातावरणातही काही काळ उत्सुकता निर्माण झाली होती. कायदेशीर वर्तुळात याबाबत विविध चर्चा आहे. कारण न्यायालयात केलेले कोणतेही विधान तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते.
आरोपीने एखाद्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्यास तपास यंत्रणा त्या दिशेने अधिक सखोल चौकशी करू शकते. त्यामुळे बचाव पक्षाकडून 'मौन राखणे' ही एक ठरवून आखलेली रणनीती असू शकते, असे कायदे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, आरोपी सहकार्य करत नसल्याचे तपास यंत्रणांकडूनही न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.
विशेषतः मोबाइल डेटा, डिजिटल पुरावे आणि कोडवर्डमधील माहिती यांचा उलगडा करण्यासाठी आरोपीची समक्ष चौकशी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोपीकडून ठोस माहिती मिळत नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा होत आहे.
या पार्श्वभूमीवर मौन बाळगणे ही बचावाची पद्धत असली, तरी तपासासाठी ते अडथळा ठरत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच, काही सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने पूर्वी न्यायालयात केलेल्या विधानांचा तपासावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावेळी अधिक सावध भूमिका घेत मौन बाळगण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मौनाचा होणार तपासाच्या दिशेवर परिणाम
एकूणच, आरोपीचे हे मौन आगामी तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील सुनावण्यांमध्ये तो भूमिका बदलतो का तसेच त्याच्या मौनाचा तपासाच्या दिशेवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान या प्रकरणात होणाऱ्या घडामोडीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.