

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आशा भोसले यांच्या निधनाने महान युगाचा अंत झाला आहे. कैलास मठाशी आशाजींचे खूप सलोख्याचे संबंध होते आणि त्यांनी अनेकदा कैलास मठाला विविध कार्यक्रमानिमित्त भेटी दिल्या. त्यांना कैलास मठातर्फे १९९७ मध्ये श्री सरस्वती पुरस्कार प्रदान करण्याचा बहुमानही आम्हाला मिळाला होता.
१९९९ मध्ये अखिल भारतीय वैदिक परिषदेचे उद्घाटनही आशा भोसले यांच्या हस्ते झाले, अशा शब्दांत त्यांनी कैलास मठाचे प्रमुख महामंडलेश्वर सविदानंद सरस्वती महाराजांनी आशाताईंसमवेतच्या आठवणींना उजाळा दिला.
नाशिकमध्ये वैदिक परिषदेच्या उद्घाटनासाठी आशाजी कार्यक्रमासाठी नाशिकच्या ताज हॉटेलमधून निघाल्या होत्या. पण त्या दिवशी वाहतूक कोंडीची विचित्र घटना घडली. त्यामुळे संपूर्ण महामार्ग ठप्प झालेला होता. वाहतूक कोंडीत अडकलेल्या आशाजींनी आपली गाडी तिथेच सोडून त्या रिक्षाने कैलास मठात पोहोचल्या.
एवढ्या विशाल व्यक्तिमत्त्वाने वेळेवर पोहोचत कार्यक्रमाला उत्तुंग उंची प्रदान करून दिली होती. हा एका घनिष्ट नात्याचा परमोच्च बिंदू होता. मी त्यांना सप्तशृंगगडावर आदिमायेच्या दर्शनासाठी अनेकदा घेऊन गेलो होतो. या प्रवासादरम्यान त्यांच्या मनात परमेश्वराप्रति असलेली भक्ती, आराधना याची प्रचिती बोलण्यातून सहज जाणवली.
आशाजींचे व्यक्तिमत्त्व खरोखर अद्भुत आणि अलौकिक होते. त्या आज आपल्यात नाहीत. मी दिवंगत आत्म्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परमेश्वर आशाजींना त्यांच्या चरणी स्थान देवो, अशा शब्दांत सविदानंद सरस्वती महाराजांनी श्रद्धांजली अर्पण केली.