

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मंगेशकर कुटुंब म्हणजे मराठी मनाच्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे लतादीदींनंतर आशाताईंचे जाणं मराठी मनाला चटका लावणार आहे. नाशिकच्या सांस्कृतिक स्मृतीत जपून ठेवाव्यात अशा काही क्षणांना जेव्हा आशा भोसले यांच्या स्वरांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा स्पर्श लाभतो, तेव्हा त्या आठवणी केवळ प्रसंग राहात नाहीत त्या एक अनुभव होतात.
त्यांच्या सहवासातील काही प्रसंगांनी जणू भावविश्व समृद्ध करून टाकल्याचे भावना फ्रेंड्स सर्कल संचालक जयप्रकाश जातेगावकर यांनी व्यक्त केली. पहिल्यांदा अभिनव लेडिज ग्रुपच्या उपक्रमात नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नेत्रतपासणी व चष्मे वाटप उपक्रमाला आशाताई उपस्थित होत्या.
हे त्या मुलांसाठी एक वेगळंच भाग्य होतं. प्रत्येक मुलाच्या डोळ्यात फक्त चष्मा नव्हता बसवला गेला, तर स्वप्नांना स्पष्ट दृष्टी मिळाली आणि त्या दृष्टीत आशाताईंच्या स्मिताची ऊब असल्याचे या क्षणी जाणवले. दुसरी आठवण जिव्हाळ्याची असून, पंचवटीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अगदी साधेपणाने त्या पायी येऊन पोहोचल्या. त्या पायऱ्या चढताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सहजता जाणवत होती.
जातेगावकर कुटुंबासोबतची ती घरगुती मैफल म्हणजे जणू स्वरांची खास भेटच होती. बोलता बोलता, वातावरणात आपुलकीचा गारवा पसरला आणि मग आशाताईंनी सहजच एक गाणं गुणगुणलं. त्या स्वरांनी घराच्या भिंतींनाही एक नादमय स्पर्श दिला. तो क्षण जणू काळाच्या पलीकडे जाऊन थांबलेला खास क्षण जातेगावकर कुटुंबाने जपून ठेवला आहे.
२००६ मध्ये स्व. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान यांनी त्या वर्षीचा पुरस्कार सोहळा आम्हास नाशिक येथे आयोजित करण्याची संधी मिळाली होती. त्या पुरस्कार सोहळ्यात संपूर्ण मंगेशकर कुटुंबीयांसोबत आशाताईसुद्धा सहभागी झाल्या होत्या. कोणताही बडेजाव न आणता त्या एक कार्यकर्त्या म्हणून सहभागी झाल्या होत्या आणि जवळजवळ संपूर्ण कार्यक्रमभर त्यांनी उभे राहून साथ दिल्याची आठवण जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितली.